नवी दिल्ली: २०१४ पासून देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसला लागलेला घरघर लागल्याचे दिसत आहे.त्यातच देशात नुकत्याच पार पडलेलय पाच राज्यांतील निवडणुकीतही पक्षाचा दारुण पराभव झाला. दरम्यान, या पाच राज्यातील निवडुकांचा फटका आता काँग्रेसला राज्यसभेत बसणार असल्याचे दिसत आहे.
राज्यांमधील आमदारांच्या संख्येवरून राज्यसभेतील खासदारांचे प्रमाण ठरते. देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी खराब होत असल्याने राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. लवकरच १७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर नसणार आहे. मार्चमध्येच काँग्रेसचे राज्यसभेत ३३ खासदार होते. आता ए. के. अँटनी यांच्यासह ४ सदस्य निवृत्त झाले आहेत. तर जून आणि जुलैमध्ये आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपेल. यामध्ये पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सभागृहातील काँग्रेस सदस्यांची संख्या जास्तीत जास्त ३० असेल असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या कधीच इतकी कमी नव्हती. तमिळनाडूतील ६ जागांपैकी १ जागा द्रमुक आपल्यासाठी सोडेल अशी आशा काँग्रेसला आहे. तसे झाल्यास काँग्रेस सदस्यांची संख्या ३१ होणार आहे. पण उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा, दिल्ली आणि गोव्यातून काँग्रेसचा एकही सदस्य नसेल ही काँग्रेससाठी मोठी चिंतेची बाब ठरणार आहे,
जाणकारांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या १७ राज्यांचा काँग्रेसचे मोठं नुकसान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमधील काँग्रेस शून्यावर राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.