अनेक ठिकाणी अग्निशामकच्या बंबांना मारावा लागतोय वळसा
पिंपरी – शहरातील विकासकामे करताना अग्निशामक दलाचा विचार केला जात नाही. यामुळे हीच विकासकामे अग्निशामक दलासाठी अडथळा ठरत आहे. चुकीच्या विकास कामांमुळे घटनास्थळी लवकर पोहचता येत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. यामुळे यापुढील विकासकामे करताना अग्निशामक दलाचाही विचार होणे गरजेचे आहे.
शहरातून जाणारा मुंबई पुणे हा 12 पदरी रस्ता झाला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. याच रस्त्यावरून बीआरटी आणि आता मेट्रोही धावू लागली आहे. मात्र ही विकासकामे करताना संकटकाळी बचावकार्य वेगाने कसे होईल, याचा विचार महापालिका प्रशासनाने केलेला नाही. उदारणार्थ सांगायचे झाले तर कासारवाडी येथील रेल्वे गेटच्या अलिकडे एखादी आगीची घटना घडल्यास संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालय सर्वाधिक जवळचे केंद्र आहे.
मात्र या ठिकाणावरून अग्निशामक दलाचा बंब निघाल्यास त्यास घटनास्थळी दाखल होण्यास फुगेवाडी येथून वळसा मारून कासारवाडी येथे यावे लागेल. तोपर्यंत आग रौद्र स्वरूप धारण करू शकते. गर्दीच्यावेळी आणखी जादा वेळ लागतो. या भागात नो-एन्ट्रीतूनही जाणे शक्य होणार नाही. या भागात दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाण्यासाठी दोन ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. मात्र अग्निशामकच्या बंबाला वळण घेण्यासाठी थेट फुगेवाडी गाठावे लागते. असाच प्रकार किवळे, मामुर्डी आणि पुनावळे या भागासाठी झालेला आहे.
या भागात जाण्यासाठी प्राधिकरण येथील जवळचे अग्निशामक उपकेंद्र आहे. मात्र येथील रेल्वे लाइनखालील वाहनांसाठी असलेला बोगदा छोटा असल्याने तेथून अग्निशामक दलाचा बंब जाऊ शकत नाही. तसेच एक्सप्रेस वे कडे जाणारा बोगदाही छोटा आहे. त्यामुळे बंब घटनास्थळी जाण्यासाठी फार लांबून वळसा मारून जावे लागते. तोपर्यंत अडकलेल्या नागरिकांचा जीव टांगणीला लागू शकतो. ठिकठिकाणी प्रशासकीय कामासाठी इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र या इमारतींमध्ये अग्निशामक दलासाठी जागा देण्याचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी व्यक्त केले.
हे आहेत पर्याय
कासारवाडी आणि दापोडी भागातील दुर्घटनांचा विचार केल्यास दापोडी येथे अग्निशामक उपकेंद्र उभारणे हा पर्याय आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या जागेचा विचार झाल्यास अग्निशामक उपकेंद्र होऊ शकते. तसेच सांगवी येथूनही अग्निशामकचा बंब लवकर घटनास्थळी जाऊ शकतो. किवळे मामुडी पुनावळे या भागाकरिता पुनावळे येथे अग्निशामक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधिन आहे. मात्र त्यावर त्वरीत कार्यवाही होणे गरजेचे आहे.