राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये केंद्रातील यूपीए आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करावे, अशा प्रकारचा ठराव मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा यूपीएचे नेतृत्व हा विषय चर्चेला आला आहे. हा ठराव संमत झाल्यानंतर अपेक्षितपणे कॉंग्रेसच्या नेत्यांनी संयमित पद्धतीने त्यास विरोध केला आहे. सोनिया गांधी यूपीएचे नेतृत्व सक्षमपणे करू शकतात आणि शरद पवार यांचीही त्याला मान्यता असेल, अशा प्रकारची विधाने कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांकडून केली जात आहेत; पण या निमित्ताने यूपीए आघाडीचे नेतृत्व बदलण्याची गरज आहे अशा प्रकारचा संदेश देण्याचे काम निश्चितच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अशा प्रकारचा ठराव होत असतानाच दुसरीकडे देशातील भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक व्यापक बैठक महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार पुढाकार घेत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.
म्हणजेच भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी दुसरीकडेसुद्धा हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याबरोबरच शरद पवार यांचीही भेट घेतली होती. याव्यतिरिक्त शरद पवार नेहमीच ममता बॅनर्जी आणि इतर काही नेत्यांच्या संपर्कात असतात. साहजिकच देशात भाजपाला पर्याय निर्माण करायचा असेल तर काहीतरी हालचाल आतापासूनच करायची गरज आहे, हा एक संदेश शरद पवार यांनी दिला आहे. कॉंग्रेसने केवळ आपल्या पक्षाची भूमिका म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केलेल्या ठरावाला विरोध केला असला तरी त्यांना ही वास्तव परिस्थिती लक्षात घ्यावीच लागणार आहे. मुळात सध्या यूपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी करत असल्या तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये विशेषत: काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही कॉंग्रेस पक्षाची कामगिरी अतिशय दयनीय झाली होती. कॉंग्रेस पक्षाचे संघटन विस्कळीत आणि कमकुवत झालेले असल्याने अशा पक्षाच्या नेत्याने एका मोठ्या आघाडीचे नेतृत्व करावे की न करावे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी ही अनेक राजकीय पक्षांची एकत्रित मिसळ आहे.
विविध विचारसरणी आणि धोरणे असणारे काही पक्ष या आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. सर्वांना एकत्रितपणे भाजपविरोधी लढा देण्यासाठी तयार करण्याचे काम सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाले की नाही, याचाही विचार या निमित्ताने होणार आहे. यूपीएमधील इतर काही पक्षांवर नजर टाकली तर त्या पक्षांचा कोणताही नेता नेतृत्व करण्यासाठी सध्या सक्षम नाही किंवा त्या पक्षाच्या नेत्यांची अशा प्रकारचे नेतृत्व करण्याची इच्छा नाही. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सक्षम पक्ष आहे आणि त्या पक्षाकडे नेतृत्वही तेवढेच सक्षम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला ज्या प्रमाणे शरद पवार यांनी निवडणुकीमध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये फायदा करून दिला त्याचप्रमाणे यूपीएचे नेतृत्व त्यांनी केले तर यूपीएचाही फायदा होईल, हे मान्य होण्यासारखे आहे. अर्थात, या गोष्टीला कॉंग्रेसचा विरोध समजण्यासारखा आहे. कारण जेव्हा यूपीएचे नेतृत्व एखाद्या नेत्याकडे जाते तेव्हा तो नेता आपोआपच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे शरद पवार यांच्या हातात जर यूपीएची सूत्रे दिली तर आपोआपच आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल, याची कल्पना कॉंग्रेसला असल्यानेच त्यांना शरद पवार यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत काही आक्षेप असू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉंग्रेस हासुद्धा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय पातळीवर युती करत असतानाच त्यांना त्या त्या राज्यांमध्ये अनेक प्रादेशिक पक्षांशी सामना करावा लागतो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी मैत्री करता येत नाही किंवा उत्तर प्रदेशामध्ये यादव यांच्या समाजवादी पक्षाशी मैत्री करता येत नाही. कॉंग्रेसच्या धोरणामध्ये अशा प्रकारचा अंतर्विरोध असल्यामुळे यूपीएचे नेतृत्व करत असताना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात; पण शरद पवार यांच्या बाबतीत मात्र अशा प्रकारचा कोणताही आक्षेप घेता येत नाही. कारण एक तर शरद पवार यांनी इतर सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चांगली मैत्री ठेवली आहे आणि त्या त्या राज्यांमध्ये शरद पवार यांचा कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी राजकीय संघर्ष किंवा निवडणुकीतील लढाई नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करून ज्याप्रकारे शरद पवार यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले ते उदाहरण समोरच असल्याने राष्ट्रीय पातळीवरही भाजपला पर्याय निर्माण करायचा असेल, तर शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व द्यायला हवे, ही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणीही निश्चितच योग्य मानावी लागते. मुळात कॉंग्रेस पक्षामध्येच सध्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने संपूर्ण आघाडीचे नेतृत्व करण्याबाबतही शंका आहेच. दुसरीकडे शरद पवार यांनी ज्याप्रकारे भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयोग सुरू केला आहे तोही दखल घेण्यासारखा आहे. म्हणजेच यूपीए आघाडीच्या बाबत काही घडू शकले नाही, तर शरद पवार यांच्या डोक्यात भाजप विरोधी आघाडी तयार करण्याचा प्लॅन बी तयार आहे, हाच त्याचा अर्थ आहे. गेली पाच ते सहा दशकं राजकारणात असणाऱ्या शरद पवार यांची कोणतीच कृती अर्थहीन किंवा दिशाहीन असत नाही.
त्यामुळे ज्या प्रकारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांनी नेतृत्व करण्याबाबत विषय समोर आणला आहे तो निश्चितच कॉंग्रेसने दखल घेण्यासारखा आहे. आगामी कालावधीमध्ये या विषयावर आणखी चर्चा अपेक्षित आहे; पण जो विषय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने समोर आणला आहे, तर निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही हे लक्षात घ्यायला हवे. भाजपला पर्याय म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीएला जर आव्हान उभे करायचे असेल तर या आघाडीचे नेतृत्व एका सक्षम आणि कणखर नेत्याच्या हातातच द्यायला हवे, याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.