पुणे – शहरातील नागरिकांना महापालिकेशी संबंधित सोयीसुविधा तातडीने आपल्याच परिसरात मिळाव्यात या उद्देशाने पालिकेने नागरी सुविधा केंद्र सुरू केली आहेत. मात्र, या केंद्रांचा कारभार ढेपाळला असून सुविधांऐवजी नागरिकांची गैरसोयच या ठिकाणचे कर्मचारी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठी या केंद्राचे उंबरे झिजविण्याची वेळ आली असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडूनही हातवर करण्यात आले आहेत. या केंद्रावर गेल्यावर कर्मचारीच नाहीत, इंटरनेट सुविधा बंद आहे, प्रिंटर बंद आहे, संगणकात बिघाड झाला आहे. लॉगईन बंद आहे. 31 मार्चमुळे कामे पूर्ण करण्याची गडबड आहे, अशी कारणे देऊन नागरिकांना परत पाठविले जात आहे.
महापालिकेकडून नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू केली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महापालिकेच्या15 वेगवेगळ्या विभागांच्या सुविधा नागरिकांना देण्यात येतात. क्षेत्रीय कार्यालयांच्या वेळेतच ही केंद्र सुरू असतात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून या केंद्रावर नागरिकांनाच त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. या केंद्रात नागरिक प्रामुख्याने मिळकतकर भरणे तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांसह पालिकेचे इतर शुल्क भरणे तसेच ना हरकत प्रमाणपत्र या केंद्रावर मिळतात. त्यामुळे दररोज या केंद्रावर नागरिक गर्दी करतात.
मात्र, या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून विविध कारणे देत हुसकावून लावले जात आहे. तर, नागरिकांकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास कामाचा ताण जास्त आहे. पुढील आठवड्यात या आम्ही तरी काय काय बघणार असे सांगण्यात येत आहे. अनेकदा नागरिक ही कामे नगरसेवकांकडे घेऊन जातात. मात्र, आता महापालिकेवर प्रशासक नेमलेला आहे. त्यामुळे नागरिकांना आता नगरसेवकांकडेही जात येत नसून जन्म-मृत्यू दाखल्यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी
दोन-दोन महिने ताटकळत राहावे लागत आहे.
माझ्या नातेवाईकाचे निधन 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर, जानेवारीतच त्यांचा मृत्यू दाखला तयार झाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत आम्हाला 9 ते 10 वेळा वेगवेगळी कारणे देऊन परत पाठवले. त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रात सूचना केल्यावर आम्हाला दाखला मिळाला. दाखल्या अभावी आमची अनेक कायदेशीर कामे दोन महिने रखडली.
– एक नागरीक
नागरी सुविधा केंद्राबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असून त्याबाबत पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. या केंद्रावर नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच, त्यांची अडवणूक होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जाईल.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका