पिंपरी – वर्षभरापूर्वी खाद्यतेलाचे दर 90 ते 100 रुपये किलो होते, पण आता यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सोयाबीन खाद्य तेलाचा भाव दीडशे रुपये किलो झाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. वाढत्या महागाईमुळे घरखर्चात वाढ झाली असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
मार्च 2020 पासून करोनाचे संकट आहे. सुरुवातीच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाकडून करोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. करोनाच्या निर्बंधामुळे खाद्यतेलाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर 20 ते 30 रुपये प्रति किलो दर घसरले होते मात्र पुन्हा दरात मोठी वाढ झाली आहे.
आजघडीला पेट्रोलचे दर हे 111.50 रुपये प्रतिलिटर आहेत. तर खाद्य तेलांनेही उच्चांक गाठला आहे. सध्या सोयाबीन तेलाचे भाव 145 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहे. करडईचे ट्रिपल फिल्टर तेल हे 210 रुपयांवरून 240 रुपये किलोवर पोहोचले असून शेंगदाणा तेल 158 रुपयांवरून 175 ते 190 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
सूर्यफूल, मोहरी आणि तिळाच्या तेलामध्येही प्रतिकिलो 20 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या तेलाच्या किंमतीमुळे गरिबांच्या भाजीला महागाईच्या तेलाची फोडणी बसत असल्याने अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहेत.