धर्मशाला – श्रेयस अय्यर, दीपक हुडा व रवींद्र जडेजा यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडीजपाठोपाठ श्रीलंकेविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिकाही निर्विवाद जिंकली.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार व सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर या सामन्यात संधी मिळालेल्या संजू सॅमसनने चांगली फलंदाजी केली. त्याने श्रेयस अय्यरच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र, स्थिरावल्यावरही अनावश्यक फटका मारून तो 18 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने सुरुवात चांगली केली मात्र, 16 चेंडूत 21 धावांची खेळी करुन तो देखील बाद झाला.
फलंदाजीत बढती देण्यात आलेल्या व्यंकटेश अय्यरने मात्र, साफ निराशा केली. यावेळी अय्यरने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली व रवींद्र जडेजाच्या साथीत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. या जोडीने संघाचा विजय साकार करताना पाचव्या गड्यासाठी 45 धावांची अखंडीत भागीदारी केली.
श्रेयसने अफलातून फलंदाजी करत या मालिकेतील सलग तिसरे अर्धशथक साकार केला. भारताने 17 व्या षटकांत 4 गडी गमावून 148 धावा करत या सामन्यासह ही मालिकाही 3-0 अशी निर्विवाद जिंकली. अय्यरने आपल्या नाबाद 73 धावांच्या खेळीत 45 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली. जडेजाने नाबाद 22 धावांची खेळी करताना 15 चेंडूत 3 चौकार फटकावले. श्रीलंकेकडून लाहिरु कुमाराने 2 गडी बाद केले. दुष्मंत चमिरा व चामिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला हा निर्णय चुकीचा ठरवला. एकवेळ श्रीलंकेची स्थिती 5 बाद 60 अशी बिकट बनली होती. दीनेश चंदीमलने 25 धावांची खेळी केली मात्र, तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्यावेळी कर्णधार शनाकाने एकहाती जबाबदारी घेतली. त्याने करुणारत्नेच्या साथीत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
शनाकाने 38 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. करुणारत्नेने त्याला सुरेख साथ देत 19 चेंडूत संयमी 12 धावा केल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 47 चेंडूत 86 धावांची भक्कम भागीदारी केली. या जोडीने जबाबदारीने फलंदाजी करत भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 5 गडी गमावून 146 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला सुरेख गोलंदाजी केली मात्र, अखेरच्या पाच षटकांत त्यांना दिशा व टप्पा योग्य राखता आला नाही व त्याचा लाभ शनाकाने पुरेपुर घेतला. अखेरच्या या पाच षटकांत श्रीलंकेने तब्बल 69 धावा काढल्या. श्रीलंकेच्या पहिल्या चार फलंदाजांना दोनअंकी धावाही करता आल्या नाहीत. भारताकडून आवेश खानने 2 गडी बाद केले. महंमद सिराज, हर्षल पटेल व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक :
श्रीलंका – 20 षटकांत 5 बाद 146 धावा. (दीनेश चंडीमल 25, दासुन शनाका नाबाद 74, चामिका करुणारत्ने नाबाद 12, आवेश खान 2-23, महंमद सिराज 1-22, हर्षल पटेल 1-29, रवी बिष्णोई 1-32).
भारत – 16.5 षटकांत 4 बाद 148 धावा. (संजू सॅमसन 18, दीपक हुडा 21, श्रेयस अय्यर नाबाद 73, रवींद्र जडेजा नाबाद 22, लाहिरु कुमारा 2-39, दुष्मंत चमिरा 1-19, चामिका करुणारत्ने 1-31).