लखनौ -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या टप्प्यात विधानसभेच्या 61 जागांसाठी रविवारी मतदान होईल.
उत्तरप्रदेशात एकूण सात टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता पाचव्या टप्प्यात एकूण 692 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांचे भवितव्य 2.24 कोटी मतदार ठरवतील. अयोध्येबरोबरच एकेकाळी कॉंग्रेसचे बालेकिल्ले असणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीत मतदान होणार असल्याने पाचव्या टप्प्याचे महत्व वाढले आहे.
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्यातील 231 जागांसाठी पहिल्या चार टप्प्यांत मतदान झाले. आता अखेरच्या दोन टप्प्यांसाठी 3 आणि 7 मार्चला मतदान होईल. त्यामुळे राजकीयदृष्ट्या देशात सर्वांधिक महत्व असलेल्या उत्तरप्रदेशातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर 10 मार्चला जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल.
त्या दिवशी उत्तरप्रदेशबरोबरच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात आहे.