नवी दिल्ली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाने रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून दोन विमाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन ते रोमानिया रस्ते मार्गे आणण्यात येईल. तेथे भारतीय अधिकारी त्यांना एअर इंडियाच्या विमानातून मायदेशी आणतील, असे केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
युक्रेनच्या हवाई हद्द वापरण्यास सर्व विमनांना बंदी घालण्याचा निर्णय त्या देशाने घेतला आहे. त्यामुळे मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना बुखारेस्टहून आणण्यात येणार असल्याची पुस्ती या अधिकाऱ्याने जोडली. शनिवारी ही विमाने बुखारेस्टहून प्रयाण मायदेशी रवाना होणार आहेत.
या घडामोडीमवर कोणतीही प्रतीक्रिया देण्यास भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पीटीआय या वृत्तसंस्थेला नकार दिला. सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थ्यांसह 20 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. अनेक भारतीयांनी किव्हमधील भारतीय दुतावासात आश्रय घेतला आहे. या दुतावासाच्या इमारतीभोवती बॉम्बिंग झाले आहे. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
किव्हपासून रोमानियाच्या सीमेचे अंतर सुमारे 600 किमी असून रस्ते मार्गे या प्रवासास आठ ते साडेअकरा तास वेळ लागू शकतो. तसेच रोमानियाची सीमा ते बुखारेस्ट हे अंतर 500 किमी असून रस्ते मार्गे या या प्रवासास आणखी सात ते नऊ तासांचा वेळ लागू शकतो.