मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आज राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपही आक्रमक झाले आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेत्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार यामिनी जाधव, अशोक चव्हाण, शिवसेना नेते सचिन अहिर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
नवाब मलिकांना अटक केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेने कार्यकर्त्यांनी राज्यभरात अंदोलन केले. आंदोलनात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचा सहभाग दिसून आला. मात्र, शिवसेनेचा एकही दिग्गज नेता आंदोलनाला उपस्थित असल्याचे दिसले नाही. मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह काही नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले आहेत.
इडीची कार्यवाही मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असे म्हणत राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सदर कारवाई सूडबुद्धीने आणि राजकीय देशातून होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भाजपचे आंदोलन
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने अनेक ठिकाणी निदर्शने केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नवाब मलिक यांच्याविरोधात घोषणा देत भाजपने निदर्शने केली. यवतमाळ, मुंबई, धुळे, नाशिक, नागपूर, बीड, कोल्हापूर आणि परभणीसह इतर अनेक शहरात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. मंत्री मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला.