मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या महिलांचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बेपत्ता मुलींचं पुढे काय होते याचा प्रश्न शासनाला पडत नाही का ? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या म्हणतात,”सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आहेत. महाराष्ट्रात मुली आणि महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे हा विषय अतिशय गंभीर आहे. मात्र, तो विषय सुप्रिया सुळेंनी अशा थाटात मांडला जणुकाही सरकार बदललं आणि राज्यातील मुली-महिला बेपत्ता व्हायला लागल्या. आधी विषय समजून घ्या. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 4 हजार मुली आणि जवळपास 64 हजार महिला बेपत्ता होतात.”
एवढंच नाही, तर 2020 मध्ये म्हणजे अगदी महाविकासआघाडीचं सरकार असताना 4 हजार 517 मुली व 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या होत्या. 2022 या कोविडच्या वर्षात राज्यातून जवळपास 3 हजार 937 मुली व 60 हजार 435 महिला बेपत्ता झाल्या होत्या ताई. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे बेपत्ता मुलींच्या 90 टक्के प्रकरणांमध्ये मुली सापडतात, तर महिलांच्या बेपत्ता प्रकरणात 75 टक्के महिला सापडतात,
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या नेत्या @supriya_sule ताई….
महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य
मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे पण आपण अशा थाटात हा विषय मांडला जणू सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या असो,
आधी विषय समजून घ्या….… pic.twitter.com/vekbWqZL9L— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 8, 2023
त्या पुढे म्हणतात,पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये सरासरी 12 हजार मुली आणि 64 हजार महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक गुन्ह्याचा दाखल केला जातो. हा विषय अतिशय गंभीर व संवेदनशील आहे. त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन सर्व महिला नेत्यांनी एकत्र येऊन उपाय सुचवले पाहिजे. केवळ टीकेसाठी टीका करणे योग्य नाही ताई असं स्पष्ट मत यावेळी वाघ यांनी व्यक्त केलं आहे.