परभणी – ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला. हृदय हेलवणारी ही घटना जिंतूर शहराजवळील अकोली शिवारात सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा या अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा नादात हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (वय 18), योगेश काशीनाथ म्हेत्रे (वय 15), रामप्रसाद विश्वनाथ म्हेत्रे (वय20, तिघेही रा. मालेगाव, जिंतूर) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
अभिषेक, योगेश आणि रामप्रसाद तिघे दुचाकीवरून जात होते. यावेळी अकोली शिवरातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याच्या नादात त्यांची दुचाकी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकवर आदळली. ट्रकखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. एकाच कुटुंबातील तिघा तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मालेगाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.