मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांच्या भाषणापेक्षा जास्त चर्चा सुरु झाली ती म्हणजे या भाषणादरम्यान बंद पडलेल्या टेलिप्रॉम्टरची. यावेळी पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावरून अनेकांनी मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली.
दरम्यान भाषणात उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार यांनी मोदींची बाजू घेत पंतप्रधानांची खिल्ली उडवणं चुकीचं असल्याचं म्हटलं.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना टेलिप्रॉम्पटर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकांनी यावरून खिल्ली उडवली. मात्र अशाप्रकारे खिल्ली उडवणं चुकीचं आहे.
रोहित पवार पुढं म्हणाले की, एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही.