पुणे : आधुनिक युगातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. एमएस धोनीने या कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2014 मध्ये विराटने पहिल्यांदा कसोटी
संघाचे नेतृत्व केले. विराटच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा वर्षे भारतीय संघाने अतुलनिय यश मिळवले. त्याचबरोबर विराटने स्वताला भारताचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणून सिद्ध केले.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने काही मोठे पराक्रम केले. विराटच्या आक्रमकतेने संघाला कसोटी क्रमवारी पहिल्या क्रमांकावर नेले आणि भारतीय संघ सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिला. विराटने इतर कर्णधारांच्या तुलनेत, संघाला परदेशातील मैदानांवरही प्रतिकुल परिस्थितील भारताला विजय मिळवून दिले.
विराट कोहलीने सर्वाधिक 68 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक 40 सामने जिंकले. तो सामने जिंकण्याच्या बाबतीत जगातील चौथा यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
विराटच्या वैयक्तिक कर्तृत्वाव्यतिरिक्त, भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणे इत्यादी इतिहास देखील रचला. या खेळाडूने देशासाठी अनेक विजय मिळवले आहेत. लेखात, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या सर्वोत्तम 3 कसोटी विजयांवर एक नजर टाकणार आहोत.
1. लॉर्ड्सवर इंग्लंडचे पानीपत (2021)
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडला पराभूत करणे एखाद्या संघासाठी नेहमीच खास असते आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने येथे आपले वर्चस्व गाजवत इंग्लंडला पराभूत करण्याची किमया केली आहे. 2021 मध्ये भारताने
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला तेव्हा हा सामना झाला होता.
मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार होता. त्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले.
पहिल्या डावात भारताने 364 धावा केल्या. यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक 129 धावांची खेळी केली. या सामन्यातील विजयात भारताच्या गोलंदाजांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. मोहम्मद शमीने अर्धशतक तर जसप्रीत बुमराहने 34 धावांचे योगदान दिले होते.
दुसरीकडे जो रूटच्या शानदार नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लिश संघाने 391 धावा केल्या. भारताने त्यांच्या दुसर्या डावात फलंदाजी केली आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले.
असे असताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश संघाला अवघ्या 120 धावांत धुव्वा उडवत 151 धावांच्या फरकाने विजय मिळवला. मोहम्मद सिराजने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून सर्वाधिक आठ बळी घेतले. तर इतर भारतीय गोलंदाजांनी सामना जिंकण्यासाठी आपले अमुल्य योगदान दिले होते. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या विजयांपैकी हा विजय खास होता.
2. अॅडलेडवर झेंडा (2018)
विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ काहीही करू शकतो हे सिद्ध करणारी मालिका आणि पूर्वीच्या भारतीय कर्णधारांनी जे मिळवता आले नव्हते ते मिळवून देणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2018-19.
अॅडलेडमधील हा सामना चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना होता. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पुजाराच्या (246 चेंडूत 123 धावा) शानदार फलंदाजीच्या बळावर भारताने 250 धावा केल्या.
पुजाराने त्यावेळी वेगळ्याच लयीत फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. तर ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 72 धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नव्हते त्यामुळे ऑसीज अवघ्या 235 धावांत गारद झाला. भारतीय संघाने दुसर्या डावातही शानदार फलंदाजी करत (पुजारा 71 आणि रहाणे 70) ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य दिले होते.
ऑस्ट्रेलियने मात्र दुसर्या डावात टच्चून फलंदाजी करत लक्ष्याच्या जवळ पोहोचण्यात यश मिळवले. पण विजयासाठी अवघ्या 31 धावा बाकी असताना, भारतीय गोलंदाजांच्या अत्यंत दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गुंडाळली गेली.
जसप्रीत बुमराह, रवी अश्विन, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन बळी घेत भारताला सामना जिंकून दिला. या विजयाने भारताच्या मालिकेतील विजयाचा मार्ग मोकळा झाला जो ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा होता कारण तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताचा पहिला कसोटी मालिका विजय होता.
3. पुण्यात वर्चस्व (2019)
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशनच्या गुहंजे येथील मैदानावर 2019 मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवले.
हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना होता. पहिल्या सामन्यातील विजयानंतर भारताने हा सामना जिंकून मालिका खिशात घातली होती. फलंदाजांसाठी अनुकुल परिस्थितीत, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलामीवीर मयंक अग्रवालने पुजाराच्या 58 धावांसह 108 धावा केल्या.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने अत्यंत आत्मविश्वासाने डावाची सुरुवात करत कसोटी कारकिर्दीतील नाबाद 254 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. जडेजाने 91 धावा केल्या. पुढे भारताने 601 धावांवर आपला डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 275 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 72 धावा केल्या तर भारताकडून रवी अश्विनने सर्वाधिक चार बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फसल्यानंतर भारताने फॉलोऑन लादला. भारताकच्या
अतिशय धडाकेबाज गोलंदाजीमुळे पाहुण्यांचा 189 धावांत गारद झाला.आफ्रिकेच्या दुसर्या डावात उमेश यादव आणि जडेजाने प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारतीय संघाने शेवटी एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवत मालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.