मुंबई -करोना लसींचे डोस घेण्यास अजूनही अनेक जण अनुत्सुकता दर्शवत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने करोना लसीकरण अनिवार्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याविषयीची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
आरोग्य कर्मचारी घरोघर जाऊन लसीकरणाचे आवाहन करत आहेत. मात्र, त्यांना काही ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अजूनही अनेकांचे लसीकरण झालेले नाही. महाराष्ट्रातील 98 लाख लोकांनी अद्याप पहिला डोसही घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार व्हावा. तशी लेखी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
लॉकडाऊन आणि निर्बंधांबाबतही केंद्र सरकारने कार्यपद्धती निश्चित करावी, अशी भूमिका टोपे यांनी मांडली. देशात मागील वर्षाच्या 16 जानेवारीपासून करोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्याने चांगला वेग पकडला. मात्र, काही नागरिक लसीकरणाविषयी उदासीन आहेत.