पुणे – स्वभाव, राहणीमान तफावतीमुळे वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट पहिल्या तारखेलाच झाला आहे. 11 डिसेंबर रोजी दाखल केलेला दावा पहिल्या तारखेला 1 जानेवारी रोजी निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार “परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो’. या प्रकरणात दोघे सुमारे तीन वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली.
वैचारिक मतभेदामुळे दोघे तीन वर्षांपासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ॲड. खंडेराव टाचले, अर्जदारांचे वकील.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांनी ॲड. खंडेराव टाचले, ॲड. मनिष मगर आणि ॲड. विजया गाढवे यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात राहतो. तर, ती पुण्यातील आहे. तो जेमतेम शिकला आहे. ती पदवीधर आहे.
एप्रिल 2018 दोघांचा पारंपरिक विवाह झाला. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. काही दिवस संसार केल्यानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. दोघांना मुलबाळ नाही. निकालानुसार दोघात स्त्रीधन, इतर दागदागिने, पैसे आणि संसारोपयोगी साहित्यांवरून कोणतेही वाद नाहीत.