नाशिक -कोरोना महामारीच्या संकटाने देशातील आरोग्य सेवा बळकट करण्याची गरज अत्यंत ठळकपणे आपल्यासमोर मांडली आहे आणि याच दिशेने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
नाशिकमधील गांधीनगर येथील सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारी आरोग्य योजनेच्या स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या.
वेलनेस सेंटरचा शहरातील सुमारे 71000 सेवारत आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 1.6 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तेथील वेलनेस सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते.
देशभर 22 नवे एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय संस्था उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. याशिवाय संपूर्ण देशात सुमारे दीड लाख स्वास्थ्य केंद्रांची उभारणी करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात आहेत असे त्यांनी सांगितले.
मुंबई, पुणे आणि नागपूर यानंतर नाशिक येथे सुरु झालेले हे महाराष्ट्रातील चौथे सीजीएचएस केंद्र आहे असे त्या म्हणाल्या.