नवी दिल्ली – गेल्या वर्षीपेक्षा यंदा भारताची अर्थव्यवस्था अधिक चांगल्या स्थितीत आहे असे प्रख्यात अर्थतज्ज्ञ पिनाकी चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. देशाच्या मॅक्रोइकॉनॉमित बरीच सुधारणा झाली असून देशात कोविडची तिसरी लाट आली नाही तर भारत पुन्हा आर्थिक विकासाच्या मार्गावर धावू शकेल असे त्यांनी म्हटले आहे.
आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे संचालक आहेत. गेल्या अठरा महिन्यात आर्थिक व वित्तीय स्थिती बरीच विस्तारली असल्याने महागाईचा दर चढाच राहील असे दिसते आहे.
सध्या बऱ्याच सेक्टरमध्ये रिकव्हरी दिसत आहे. देशात कोविड लसीकरण व्यापक प्रमाणात झाले असल्याने त्याचाही देशाच्या अर्थ क्षेत्रावर विधायक परिणाम दिसून येत आहे. जर देशात तिसरी लाट आली नाही तर आपण चांगल्या आर्थिक विकासाच्या दिशेने जाऊ शकतो असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आपण जर आपली तुट आणखी नियंत्रणात ठेऊ शकलो तर जी आर्थिक रिकव्हरी होईल ती अधिक आश्वासक आणि टिकाऊ असेल.
देशातील सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी खासगी आणि सरकारी सेक्टर मध्ये रोजगार निर्मीती होणे अधिक आवश्यक आहे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. चालू आर्थिक वर्षातील सर्वच पातळीवरील तूट जीडीपीच्या सुमारे दहा टक्के इतकी असेल असे अनुमान वर्तवण्यात येत आहे.