नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संसदेच्या अधिवेशनात पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई, बेकारी या महत्वाच्या विषयावर सरकारने चर्चा करावी अशी मागणी यावेळी विरोधकांकडून पुढे करण्यात आली.
सीमा सुरक्षा दलांचे कार्यक्षेत्र वाढवून राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याबद्दलही सरकारकडून उत्तर दिले जावे अशी मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
फायद्यात चालणाऱ्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर सरकारने कायदा करावा अशी मागणी तृणमुल कॉंग्रेसचे प्रतिनिधी सुदिप बंडोपाध्याय, डेरेक ओब्रियन यांनी यावेळी केली.
या बैठकीला कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, अधिर रंजन चौधरी, आनंद शर्मा, द्रमुकचे टीआर बालू, त्रिची शिवा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे रामगोपाल वर्मा, बसपाचे सतिश मिश्रा, बिजु जनता दलाचे प्रसन्न आचार्य, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आदि नेते उपस्थित होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार पासून सुरू होणार असून ते 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.