पुणे – अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. ‘कंगना खरी बोलली. तिच्या मताशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे,’ असं गोखले यांनी म्हटले आहे. गोखले यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या चित्रपट सेनेने केली आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विक्रम गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. गोखलेंनी ठाकरेंशी कोणताही संबंध जोडू नये. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,” असे शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या चिटणीस कीर्ती पाठक यांनी म्हटले आहे. दरम्यान, विक्रम गोखले यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
विक्रम गोखले नेमकं काय म्हणाले ?
विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप-शिवसेना युती, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य यावर भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का ? योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,” असे विक्रम गोखले म्हणाले आहेत.