मुंबई, – राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिक पाण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जे एक ऍप विकसित केले आहे, त्या ऍपवर 58 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ई पिक पाणी असे या ऍपचे नाव आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सरकारने हे ऍप विकसित केले आहे.
या ऍपवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेण्यात आलेल्या पिकाची माहिती नोंदवणे अपेक्षित आहे. त्याद्वारे सरकारलाही राज्यात कोणत्या पिका खाली किती लागवड झाली आहे याचे नियमीत अपडेट मिळणार आहेत.
त्यातून कृषी मालाच्या उत्पादनाचाही आकडा सरकारला विनासायास मिळू शकणार आहे. 15 ऑगस्टला हे ऍप लॉंच झाले. त्याच्या पहिल्या दोन महिन्यातच 58 लाख 39 हजार 804 शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे. चालू खरीप हंगामात राज्यातील 1 कोटी 49 लाख 73 हजार 625 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 82 हजार 494 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या पिकांची माहिती सरकारकडे उपलब्ध झाली आहे.
या खेरीज पुर्ण वर्ष या वर्गवारीत 6 लाख 35 हजार 383 हेक्टर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची माहिती सादर केली आहे. या आधी राज्यातील पिकांची नोंद प्रत्यक्ष पहाणीद्वारे केली जात असे परंतु त्यात महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन त्याची माहिती घेणे जिकीरीचे होत असे.
या ऍपमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचेही काम सोपे झाले आहे. या ऍपवर जळगाव, अमरावती, आणि यवतमाळ या जिल्ह्यातींल शेतकऱ्यांनी सर्वाधिक नोंदणी केली आहे.