अरब-इस्रायलपासून आम्ही काहीच धडा घेणार नाही काय?
अरब आणि इस्रायली हे राष्ट्रसंघाचा आदेश व्यवहारात मानावयास तयार दिसत नाहीत. कारण त्या सर्वच राष्ट्रांनी त्या संघटनेचे पाणी जोखले आहे. ती राष्ट्रसंघटना जागतिक शांतता निर्माण करण्याच्या थोर उद्दिष्टापोटी स्थापन झाली आहे, असे ती राष्ट्रे मानतच नाहीत. तो भोळा भाव एक भारताने काय तो टिकवून धरला आहे. काश्मीर प्रकरणी ते वेंधळेपण आम्हाला नडले.
काश्मीरचा अर्धाअधिक भूभाग आम्ही खुशाल आक्रमित राहू दिला. तो प्रश्न निकालात काढण्याचे कितीतरी भोके चालून आले होते. पण आम्ही ते वाया दवडले. आमची चिंता एकच, जागतिक शांततेचे काय होईल? अरब-इस्रायल युद्धामुळे जागतिक शांततेचे कोठे काय बिघडले? तिची साधी झोपमोडसुद्धा झाली नाही. अरब-इस्रायलींना आमच्या मानाने आपापले हित अधिक समजते.
बांधकामाचे तडे शोधून काढणारे यंत्र
लंडन, दि. 26 – पूल, मनोरे, खांब वगैरेसारख्या बांधकामांमध्ये तडे गेल्याने संभवणाऱ्या धोक्यांचा आगाऊ इशारा देणारे एक साधन दक्षिण इंग्लंडमधील ऍडमिरॅल्टीच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. धातू, लाकूड व इतर पदार्थांना जाणारे तडे वाढत जाताना आवाज करतात. वैज्ञानिकांनी हे तडे हुडकण्याचे एक साधन बनविले आहे. तडा नेमका कुठे जात आहे हेदेखील या साधनांवरून समजू शकते.
भुट्टोंच्या वागण्याकडे भारताचे लक्ष
नवी दिल्ली – 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर आता पाकिस्तानची लष्करी ताकद बरीच वाढली आहे. कोणत्या मार्गाने ही मदत पाकिस्तानला मिळाली हे “उघड गुपित’ आहे, असे मत संरक्षण मंत्री जगजीवनराम यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले. पंतप्रधान भुट्टो यांच्या वागण्याकडेही भारताचे लक्ष आहे.