नवी दिल्ली – क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आज नवी दिल्लीतील “एनसीबी’च्या मुख्यालयात दाखल झाले. आर.के.पुरम येथील “एनसीबी’च्या मुख्यालयाच्या इमारतीत मागच्या बाजूने वानखेडे यांनी प्रवेश केला आणि आपल्या वरिष्ठांची भेट घेतली असे समजते आहे. यावेळी “एनसीबी’च्या कार्यालयाबाहेर काही व्यक्ती वानखेडे यांच्या समर्थनार्थ कापडी फलक घेऊन घोषणाबाजी करत होते.
वानखेडे यांनी “एनसीबी’चे महासंचालक एस.एन.प्रधान यांची भेट घेतली की नाही, हे समजू शकलेले नाही. मात्र “एनसीबी’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली आणि देशातील विविध विभागीय कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला, असे समजते आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी “एनसीबी’चे उत्तर विभागाचे उपमहासंचालक ग्यानेश्वर सिंह हे करत आहेत. ते करत असलेल्या चौकशीसाठी कोणालाही बोलावण्यात आलेले नाही, असे स्पष्टिकरण त्यांनी “एनसीबी’च्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हा वानखेडे यांना बोलावण्यात येईल. या चौकशीसाठी आपण मुंबईला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एका पंचाने केलेल्या खंडणीविषयीच्या आरोपांनंतर “एनसीबी’ने दक्षता चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या पाश्वभूमीवर वानखेडे दिल्लीच्या मुख्यालयात गेले आहेत.
धमक्या मिळत असल्याचा पत्नीचा आरोप
चर्चेत असलेले “एनसीबी’चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी या प्रकरणात वानखेडे यांची पाठराखण केली आहे. आपल्याला धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. इंचरनेटवर आपल्याला ट्रोल केले जात आहे. राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप रेडकर यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र आपल्याला भीतीच्या सावटाखाली रहावे लागत असल्याचेही त्या म्हणाल्या. आपले पती प्रामाणिक सरकारी अधिकारी असून या प्रकरणातील पंचाने केलेल्या खंडणीच्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.