मुंबई – जागतिक बाजारात महागाईमुळे नकारात्मक वातावरण असूनही सरकारी बॅंकांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी निर्देशांक वाढून नव्या उचांकी पातळीवर गेले.
सकाळी शेअर बाजारात बरीच विक्री झाली होती. मात्र नंतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, वाहन, ग्राहक वस्तू इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात वाढ नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 148 अंकांनी वाढून 60,284 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 46 अंकांनी म्हणजे 0.26 टक्क्यांनी वाढून 17,991 अंकांवर बंद झाला.
टायटन, बजाज ऑटो, बजाज फिन्सर्व, स्टेट बॅंक, नेस्ले ऍक्सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. गेल्या काही दिवसापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या शेअरची विक्री होत आहे. मात्र ग्राहक वस्तू, धातू, वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे.