सांगली – राज्यभरात पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये गावाच्या ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत त्यांचा सहा वर्षांचा लहान भाऊ सुदैवाने बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील उमदी गावात ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका ऐवळे (वय 7) आणि लक्ष्मी ऐवळे (वय 11) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला त्यांचा लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे हा बचावला आहे.
ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहत होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. घरातील सर्व लोक आज सकाळी दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते.
घरात दोन मुली आणि एक मुलगा हे घरात होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहिणी आणि भाऊ असे तिघे ओढापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
त्याचवेळी त्यांच्या सोबतच पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले आणि त्याने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले.