पुणे –आजमितीस लोकसंख्येत 18 ते 19 वयोगटातील नागरिक साडेतीन टक्के असले, तरी प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये मात्र केवळ एक टक्का युवकांची नोंदणी आहे. त्यामुळे पुढील काळात युवकांचा मतदार यादीतील टक्का वाढवण्याबरोबर त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने “लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, उच्च शिक्षण विभाग संचालक डॉ. धनराज माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, डॉ. दीपक पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रुती तांबे, डॉ. राजेश्वरी देशपांडे, डॉ. सुहास पळशीकर यांचा सत्कार करण्यात आला.
देशपांडे म्हणाले, “19 ते 30 या वयोगटातील युवकांची संख्या लोकसंख्येत 18 टक्के आहे, मात्र मतदार नोंदणीत केवळ 13 टक्के युवक आहेत. या युवकांना लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात त्याविषयी साक्षरता निर्माण करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. याअंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ, लोकशाही गप्पा, मतदार नोंदणी असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.’ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सूत्रसंचालन तर साधना गोरे यांनी आभार मानले.
लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. या मूल्यांची रुजवण शिक्षकच करू शकतात. विद्यापीठामध्ये लोकशाही, संविधान या विषयावर अभ्यासक्रम आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निश्चितच असे कार्यक्रम विद्यापीठात होतील.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू