पिंपरी – स्थायी समितीच्या अध्यक्षांवर झालेली कारवाई शोभनीय नाही. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याबाबत तपास करीत आहे. अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांच्या पक्षाचा नैतिक अधिकार आहे. मात्र, यामध्ये दोषी असलेल्या कोणचीही गय केली जाणार नाही. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांचाही समावेश असला तर त्यांनाही सोडले जाणार नाही. त्यामुळे लाचखोरांवर कारवाई होणारच हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 3) स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणात अटक केली होती. या प्रकरणामध्ये पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचाही समावेश आढळल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत हे सर्वजण जामिनावर बाहेर असून लांडगे नुकतीच स्थायी समितीची सभा घेतली होती. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गेली साडेचार वर्षे शहरात भाजपाची सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना शहरामध्ये अनेक विकासकामे झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माझ्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी शहरात दर्जेदार कामे केली.
राष्ट्रवादीची सत्ता असताना कधीही अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या नाहीत. कारण तेव्हा खऱ्या अर्थाने पारदर्शक कारभार केला जात होता. आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या तपासामध्ये आपण हस्तक्षेप करत नाही. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईलच. कारण कोणत्याही भ्रष्टाचाराच्या घटनेला महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालणार नाही. त्यामध्ये भलेही राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक असो.
शहरामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल तर त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना देखील मी सूचना केल्या आहेत. शहरात कायदा चांगला राहिला पाहिजे. यामध्ये कोणालाही विनाकारण त्रास देण्याचा हेतू नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
नागपूरकरांचे शहराकडे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व रखडलेल्या विकासकामावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मोठी फसवणूक झाली. नागपूरच्या नेत्यांनी आश्वासने देऊन सत्ता घेतली. मात्र, सत्ता आल्यानंतर फिरून शहराकडे लक्ष दिलेच नाही. भाजपच्या कोणत्याच नेत्याचे आज पिंपरी पालिकेकडे लक्ष नाही. प्रत्येकाला आपल्या शहराचा आपलेपणा असतो. नागपूरकडे लक्ष देणाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची टीका यावेळी पवार यांनी केली.
शहर राज्यात अग्रेसर करणार
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही शहरांचा विकास करण्यावर भर दिला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड ही शहरे राज्यात कशी अग्रेसर राहतील, यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करत आहे. शहरामध्ये सहकार, कामगार व कृषी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. नुकतेच शहरात चांगले विज्ञान केंद्र उभे करण्याचा निर्णय घेतल्याचेही पवार यांनी सांगितले.
पुरावे द्या, चौकशी लावतो
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचे वारंवार सांगितले जाते. या भ्रष्टाचाराबाबत स्थानिक नगरसेवकांनी पुरावे द्यावेत, मी या भ्रष्टाचारांची शासनाकडून चौकशी लावतो, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. काही महिन्यांपुर्वीही पवार यांनी भ्रष्टाचार आणि पुराव्याबाबत भाष्य केल्याने सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत पवार गंभीर असल्याचेच समोर आले आहे.