कोल्हापूर – कोल्हापुरातील सामाजिक चळवळीतील अग्रणी आणि टोल विरोधी आंदोलन कृती समितीचे निमंत्रक निवासराव श्रीपतराव साळोखे यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. सार्वजनिक जीवनात “तात्या’ या नावांनी परिचित होते. बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्षपद अनेक वर्षे त्यांनी भूषविले. तालीमच्या नूतन इमारत बांधणीत त्यांचा पुढाकार होता.
कोल्हापुरातील नागरी प्रश्नांशी निगडीत विषयावर आंदोलने केली. सीमालढ्यात त्यांनी सहभाग घेतला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे ते काही वर्षे शहराध्यक्ष होते. राजीव सूत गिरणी उभारणीसाठी त्यांनी काम पाहिले.
कोल्हापूर शहर रस्ते विकास प्रकल्पातंर्गत रस्ते बांधणी प्रकल्प झाला. “बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावरील प्रकल्पात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पहिल्यापासून झाल्या. 255 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात आयआरबी कंपनीला तीस वर्षे टोल वसुलीचा अधिकार दिला होता.
रस्ते प्रकल्पाच्या कामाची चौकशी आणि टोलला विरोध यासाठी कोल्हापुरात विविध पक्ष, संघटनांनी जन आंदोलन उभारले. टोल विरोधी आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन झाली. साळोखे हे टोल विरोधी आंदोलन कृती समितीचे निमंत्रक होते. प्रचंड आंदोलनांमुळे राज्य सरकारने कोल्हापूरचा टोल रद्द केला होता.