जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ।। ज्ञानापासून दूर राहणाऱ्या समाजाला जागृत करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या साधकांना ज्ञानाच्या सामर्थ्याविषयी माऊली चौथ्या अध्यायातील 172, 173, 174 क्रमांकाच्या ओवीमध्ये सखोल मार्गदर्शन करतात.
माऊली म्हणतात, तू पातकांचे आगर, भ्रमाचा सागर आणि मोहाचा डोंगर जरी असलास तरी या परम ज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता हे सर्व तुच्छ आहे, असे या आत्मज्ञानात सर्वांचा नाश करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. हे पाहा की, विश्वाच्या अस्तित्वाचा जो मोठा भ्रम आहे किंवा ब्रह्म निर्गुण निराकार आहे.
त्याच्या छायेसारखा हा जो थोर सर्व विश्वाचा आकार आहे तो भ्रमाने भासतो. तो भ्रम देखील त्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजेच थोडक्यात प्राप्त ज्ञानामुळे संपूर्ण विश्व भ्रम नाहीसा होतो. या ज्ञानाला मनाचे दोष किंवा पाप हे घालविणे अवघड आहे का?
ज्ञानाने मनातील दोष कसे जातील, असे बोलणेच अत्यंत अनुचित आहे. या जगात ज्ञानासारखे सामर्थ्यशाली दुसरे काहीही नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर अशक्य गोष्टी शक्य होण्यास विलंब लागत नाही..