मुंबई : हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये सुमारे १० शेतकरी गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले. भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेने भाजपावर सडकून टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखामधून हरियाणामधील शेतकऱ्यांचा हल्ला आणि महाराष्ट्रामध्ये नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा संदर्भ देत भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
“महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पंतप्रधान मोदी प्रेरणेने ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू असतानाच हरियाणात शेतकऱ्यांवर निर्घृण आणि अमानुष लाठीहल्ला झाला आहे. हा लाठीहल्ला साधा नाही. अंदाधुंद गेळीबारापेक्षा भयंकर आहे. अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरियाणाच्या भाजपा सरकारने शेकडो शेतकऱ्यांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा रक्तपात झाला,” असं लेखाच्या सुरुवातील म्हटलं आहे.
‘‘शेतकऱ्यांना डोकी फुटेपर्यंत मारा, शेतकरी आंदोलनासाठी उतरल्यावर डोक्यावर नेम धरून काठय़ा-लाठय़ा चालवा. डोकी फुटायलाच हवीत’’ असा आदेश उपजिल्हाधिकारी आयुश सिन्हा हे पोलिसांना देत असल्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला आहे. उपजिल्हाधिकाऱयांचा आदेश हा सरकारी आदेश असतो. सरकारने शेतकऱ्यांना खतमच केले. ‘‘शेतकऱ्यांची डोकी फोडणारे हरियाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा’’ अशी मागणी आता कोणी करणार आहे काय?
मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर ‘सूक्ष्म’ कायदेशीर कारवाई होताच ‘‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा हो’’ अशा बोंबा ठोकणारे हेच लोक हरियाणातील रक्तबंबाळ शेतकऱ्यांचे चित्र पाहून गप्प आहेत. कोण हा उपजिल्हाधिकारी आयुष सिन्हा? शेतकऱ्यांची डोकी फोडा, असा बेगुमानपणे आदेश देतोय. हा अधिकारी क्षणभरही नागरी सेवेत राहता कामा नये. त्याच्या बडतर्फीचे काम तरी सरकार करू शकते की नाही? सरकारला जन आशीर्वाद हवा आहे, तो शेतकऱ्यांची अशी डोकी फोडून मिळणार आहे काय?”, असा प्रश्न लेखात उपस्थित करण्यात आलाय.
“गेल्या वर्षभरापासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या मागण्यांसाठी तळ ठोकून बसला आहे. ऊन-वारा-पाऊस-वादळाची पर्वा न करता तो तेथे ठामपणे उभा आहे. या आंदोलनात आतापर्यंत दोनशेच्या आसपास शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. शेतकरी जागचे हटलेले नाहीत. तरीही सरकारचे मन द्रवलेले नाही. हजारो शेतकरी संसद अधिवेशन काळात दिल्लीत येऊन जंतर मंतर रोडवर आंदोलन करीत होते, पण पंतप्रधान मोदींची पावले तिकडे वळली नाहीत.
शेतकऱ्यांची ‘मन की बात’ काय आहे? त्यांच्या पोराबाळांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी तीन काळे कृषी कायदे रद्द करा, हीच त्यांची मागणी आहे. शेतीचे खासगीकरण थांबवा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या कॉर्पोरेटवाल्यांच्या हाती जाऊ देऊ नका, आधारभूत मूल्यांचा कायदा करा यापेक्षा मोठी मागणी काय आहे? पण या मागण्यांसाठी हजारो शेतकरी गाझीपूरच्या सीमेवर वर्षभर बसून आहेत व सरकार त्यांच्याशी निगरगट्टासारखे वागत आहे,” असे लेखात म्हटले आहे.
तसेच, “शनिवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सैतानी हल्लाच केला. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करणाऱया सायमनविरोधात शेतकऱ्यांचे नेते लाला लजपतराय रस्त्यावर उतरले तेव्हा ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना असेच डोकी फुटेपर्यंत मारले. त्यातच लालाजींचा अंत झाला. आज हरियाणातही तेच घडले,” अशी तुलनाही लेखात करण्यात आली आहे.
“भाजपाच्या राज्यस्तरीय बैठका सुरू असताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात फक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी सरकारी आदेशाने शेतकऱ्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. एका मंत्र्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली म्हणून राज्य सरकार असहिष्णू कसे यावर बोलले गेले. मात्र आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी फक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी बेकायदेशीरपणे त्या निरपराध लोकांची डोकी फोडली.
एवढे होऊनही सोयिस्कर मौन बाळगणारा भाजपा महाराष्ट्रात मंत्र्यास खाऊन-पिऊन जामीन देऊन सोडले तरी थयथयाट करीत आहे. जरा त्या खट्टर सरकारच्या सैतानी-राक्षसी हल्ल्यांकडे पहा. रक्ताने ओघळणारी शेतकऱ्यांची डोकी, वेदनेने थरथरणारी शरीरे पहा. ती तुम्हाला का दिसत नाहीत?,” असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
“अमृतसरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच अगदी बाजूला हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे दुसरे ‘जालियनवाला बाग’ घडत होते, पण ना दिल्लीचे सरकार जागचे हलले ना महाराष्ट्रातील ‘जन आशीर्वाद’ यात्रेला हुंदका फुटला. एक मात्र नक्की, सरकार ज्या निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत.
देशातील शेतकऱ्यांनी उठाव करावा व बळीराजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यावा असे हे प्रकरण आहे. हरियाणातील ‘खट्टर’ सरकारला सत्तेवर राहण्याचा थोडाही अधिकार नाही, पण ‘‘शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाट वाहिले म्हणून खट्टर सरकारला जन आशीर्वादाचा अभिषेक लाभला’’ असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.