पुणे – देशातील जाचक कृषी कायदे, वाढती बेरोजगार, वाढती महागाई आणि अवाच्या सव्वा केलेली इंधन दरवाढ यामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकार सामान्यांची पिळवणूक करत असून देश अडचणीत आला आहे. कोट्यवधी लोक गरिबी रेषेच्या खाली आली आहेत. या स्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत. देशातील परिस्थितीवर अण्णांनी भूमिका घ्यावी, अशी खदखद पुण्यातील देश बचाव जनआंदोलन समितीने व्यक्त केली. अन्यथा राळेगणसिद्धी येथे जाऊन केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा समितीचे प्रमुख ऍड. रवींद्र रणसिंग यांनी केली.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रणसिंग पवार, मारोती भापकर, विकास देशपांडे, रवींद्र देशमुख, अभय भोर, दीपक पाटील, दुर्गा भोर, सुरसे, संदीप बर्वे, मुकुंद काकडे आदी उपस्थित होते.
सध्या देश अत्यंत भयानकतेकडे वाटचाल करीत आहे. अविचारी नोटबंदीनंतर झालेली आर्थिक हानी, कोरोना लॉकडाऊन, वाढती महागाई, बेरजोगारी यामुळे संपूर्ण देशातील सामान्य जनता भरडली जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अत्यंत बेजबाबदार नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. उद्योग व्यवसाय बंद झाले. बेजबाबदार निर्णयांमुळे सरकारचे कराचे उत्पन्न घटले. ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. त्यासाठी भरमसाठ इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप रणसिंग यांनी केला.
देशातील पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आहेत. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. देशात एवढं सगळ होत असताना अण्णा हजारे मात्र गप्प आहेत. भ्रष्टाचारातून देश बाहेर काढण्यासाठी आमच्यापैकी अनेकजण अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आता देश अडचणीत असताना अण्णा चकार शब्द काढत नाहीत. पुढील १५ दिवसांत अण्णांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर आमचं नेतृत्व करावं अन्यथा आम्ही राळेगणसिद्धी येथे जाऊन केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचं, मारोती भापकर यांनी म्हटलं. अण्णांनी केवळ आमच्या पाठिशी राहावं, केंद्र सरकारला जाब विचारावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
आम्ही अण्णांच्या २०१२ सालच्या चळवळीत सामील होऊन देशातून युपीए सरकाऱला हद्दपार केलं . मात्र आता देश चुकीच्या हातात गेल्याच लक्षात येतय. तरी अण्णा अजुनही याकडे डोळेझाक करत आहेत. देशातील सजग नागरिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. हा आदरणीय अण्णांना आणि केंद्रातील मोदी सरकारला देश बचाओ जनआंदोलन समितीचा इशारा, असल्याचं रणसिंग पवार यांनी स्पष्ट केलं.
जगात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल व गॅस भारतीय नागररकांना खरेदी करावा लागतो. याचे आता घाट घातला, जाचक तीन कृ षी कायद्यांचा. यामध्ये मागील 8 महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार या आंदोलनाची काहीही दखल घेत नाही. यावर अण्णांनी बोलायला हवं. या कायद्यांसंदर्भाती त्यांची भूमिका अनाकलणीय असल्याचं विकास देशपांडे यांनी म्हटलं.
दुर्गा भोर यांनी विद्यार्थ्यांच्या आणि महिला बेरोजगारीकडे लक्ष वेधत अण्णांनी या संदर्भातही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावं, अशी विनंती केली.