मुंबई – शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यात. ग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. विशेषत: अकोला, अमरावती, बुलडाणा जालना, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या समित्या गठित करण्याची प्रक्रिया गतिमान करावी. समित्या गठित करण्याचे काम प्राध्यान्याने करून गावातील कामे मार्गी लावावीत.
ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून काम करण्याबाबतच्या अडचणी ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. या युनियनचे म्हणणे उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेऊन ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवकांनी काम करावे, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसेवक युनियनने कामकाज सुरू करण्याचे मान्य केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली.