मुंबई – राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परंतु पुण्यासह 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. ही नवी नियमावली बुधवार, दि. 4 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
यामध्ये व्यापारी वर्गांचा रोष पाहता व आज सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्या प्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. राज्यातील 25 जिल्ह्यांत शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग, सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडी राहतील.
राज्यातील अधिक रुग्ण संख्या असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर निर्णय घेणार आहे.
या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय,वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, धार्मिकस्थळे उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळे ही बंदच असणार आहे.
सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, जी कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.