पुणे : समाविष्ट गावांमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी या गावांचा समावेश महापालिकेच्या चोवीस तास समान पाणी योजनेत करण्यात यावा असा प्रस्ताव माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिला आहे. तसेच, तो पर्यंत या गावांसाठी महापालिकेच्या माध्यमातून तातडीनं पाण्याचे टॅंकर देऊन पाणी समस्या सोडविण्यात यावी अशी मागणीही बालवडकर यांनी केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक बालवडकर यांची सूस आणि म्हाळूंगे गावांसाठी समंन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली असून या गावांची लवकरच महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.
बालवडकर यांनी दिलेल्या प्रस्तावनुसार, महापालिका हद्दीत नुकतीच 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहे,या गावांसाठी महापालिका प्रशासनाकडून संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधा देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पालिकेने तातडीनं पावले उचलणे आवश्यक आहे. या सुविधांमध्ये पाणी, ड्रेणेज, कचरा, एसटीपी, विद्युत या विभागांच्या माध्यमातून तातडीनं उपाय योजना होणे आवश्यक आहे. तसेच या गावांमध्ये मोठया प्रमाणात पाण्याच्याही समस्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी या गावांची पाणी समस्या सोडविण्यासाठी या गावांचा समावेश महापालिकेच्या समान पाणी योजनेत करावा तसेच तो पर्यंत या गावांसाठी पालिकेने तातडीनं टॅंकर सुरू करावेत असे या प्रस्तावा नमूद करण्यात आले आहे.
सुस- म्हाळूंगेसाठी लवकरच बैठक
बालवडकर यांची भारतीय जनता पक्षाकडून सुस आणि म्हाळूंगे गावाच्या समंन्वयकपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अंतर्गत, लवकरच या गावांसाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले, या गावातील समस्या तातडीनं सोडविण्यासाठी या बैठकीस महापालिका आयुक्तांसह, संबधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार असून त्या माध्यमातून महत्वाचे प्रश्न तातडीनं सोडविण्यास प्राधान्य राहणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.