पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथ सॅनिटायझर बनवणाऱ्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला सोमवारी (दि. 7) दुपारी भीषण आग लागली. यात अंदाजे 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 18 कामगारांचे मृतदेह मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. रात्री उशीरा सापडलेला मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याची ओळख पटलेली नाही.
उरवडे रस्त्यावर ही एस.व्ही.एस. ही केमिकल कंपनी आहे. सोमवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास या कंपनीत एक स्फोट झाला. त्यामुळे आग पेटली. त्यावेळी 18 कामगार कामावर होते. मात्र आगीने पेट घेताच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे या कामगारांना तेथून बाहेर पडताच आले नाही. त्यातच धुराचे लोट निर्माण झाल्याने त्यांना नेमकी दिशाही समजू शकली नसावी. ही आग इतकी भयानक होती की मुख्य दरवाजातून कामगारांना बाहेर काढणे अशक्य होते. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीसांनी मागील बाजूची भिंत दोन जेसीबीच्या मदतीने तोडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, पोलिस मित्र तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमने जळालेले मृतदेह बाहेर काढले.
आग अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि एक टॅंकरच्या मदतीने नियंत्रात आणण्यात यश मिळाले. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहने पोहोचण्यास उशीर लागत होता. रात्री आठ वाजणाच्या सुमारास आग आटोक्यात आणली.
मृतदेह अन् नातेवाईकांचा आक्रोश…
आग लागल्याचे वृत्त अवघ्या काही वेळातच सर्वदूर पसरले. त्यामुळे कंपनीत काम करत असलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी कारखान्याच्या परिसरात गर्दी केली होती. आग एवढी भयानक होती की मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. काही मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक होता. तर काहींची राख झाली होती. तर मृतदेह बाहेर आणताना नातेवाइकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.
कंपनीत होते 41 कर्मचारी
या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. शोध मोहीम संपली की नेमका मृतांचा आकडा कळणार असून ही फारच मोठी दुर्घटना असून मनाला खिन्न करणारी असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
बाहेर जाण्याचा मार्ग असता तर…
एसव्हीएस ही कंपनी उरवडे रस्त्यावर आहे. कंपनीला पश्चिम बाजूला आत प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. आत प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. नेमकी आग ही कंपनीच्या पूर्व बाजूला असलेल्या भागात लागली. कारखान्याला बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. कंपनीच्या मागील बाजूस किंवा दुसरीकडे जर पर्यायी बाहेर पडण्याचा मार्ग असता तर या घटनेत मृत पडलेल्या नागरिकांचा जीव वाचला असता. उरवडे येथील कंपनीतील अग्नीतांडवाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,
“धुरामुळे कंपनीत जाण्यास अडचण येत आहे. अजूनही काम सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस, महावितरण, अग्निशमन दल, पीएमआरडी संयुक्तपणे चौकशी करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.”
-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक