पुणे -महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. मात्र, खेड येथे घडलेल्या प्रकरणांमुळे आघाडीत कटूता निर्माण होत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिक कुरघोड्या, राजकारण होत असते. मात्र, ते किती मर्यादेपर्यंत व्हावे, हे निश्चित केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
“खेडप्रकरणी आपण राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत नाराजी अथवा त्यांच्यावर खापर फोडलेले नाही. खेडचे आमदार दिलीप मोहितेच या प्रकरणाचे सूत्रधार असून, त्यांच्याबाबत आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती दिली होती.
तसेच मोहिते यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समजावून सांगावे, अशी आपली भूमिका आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच आपण खेड येथे आलो,’ असेही राऊत म्हणाले.
पाठीत वार करणे, ही आमची प्रवृत्ती नाही
देवेंद्र फडणवीस यांनी “राष्ट्रवादीसोबत जाणे चूक होते, पण शिवसेनेने आमच्या पाठीत वार केला’ असे वक्तव्य केले. त्यावर राऊत म्हणाले, “भाजपने राष्ट्रवादीसोबत जाणे चूक होते.
अजित पवार त्या संध्याकाळपर्यंत पवार साहेंबाकडे पुन्हा येतील, असे सर्वांत आधी मी म्हणालो होतो. तसेच झालेही. आता पाठीत खंजीर खुपसणे हा मिळमिळीत शब्द झाला असून, शिवसेना कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही. आमची ती वृत्तीही नाही, आम्ही समोरून वार करतो आणि छातीवर वार घेतो,’ असे राऊत म्हणाले.