औरंगाबाद – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. तर अनेकांना आपल्या नोकऱ्या सुद्धा गमवाव्या लागल्या आहेत. बेरोजगारीत वाढ झाली असून अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. करोना पाठोपाठ ही सुद्धा एक मोठी समस्या तयार झाली आहे. लॉकडाऊनमुळे तणावाखाली आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार औरंगाबादमधून समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहीली असून त्यामध्ये माझ्या पत्नीनं पार्थिवाला अग्नी द्यावा, अशी शेवटची इच्छा या तरुणाने व्यक्त केली आहे.
भीमराव कांबळे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून औरंगाबादमधील वेदांतनगर परिसरात तो आणि पत्नी असे दोघे मिळून राहत होते. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भीमराव यांनी लॉकडाऊनपुर्वी वाहन कर्ज काढून एक रिक्षा घेतली होती. मात्र देशासह राज्यात करोनाची लाट आली आणि लॉकडाऊन लावण्यात आला याचा फटका भीमराववा सुद्धा बसवा व तो संकटात सापडला व तणावात गेला. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
गुरुवारी रात्री भीमराव तासाभरात येते असे आपल्या पत्नीला सांगून घरातून निघून गेला मात्र बराच वेळ झाला तरी आपला पती आला नाही याबाबत त्याचे मित्र व नातेवाईकांकडे पत्नीने चौकशी केली. कोणतीच माहिती न मिळाल्यामुळे पत्नीने आपले शोधकार्य चालूच ठेवले असता भीमराव राजनगरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला. यावेेळी एक सुसाईड नोट मिळाली असून यामध्ये डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळं आत्महत्या करत असून आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, तसेच माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्नी द्यावी अशी ईच्छा सुद्धा नोट मध्ये व्यक्त करण्यात आली. पोलिस पुढिल तपास करीत आहेत.