नवी दिल्ली – यंदाचे आयपीएल रद्द केल्याने बीसीसीआयला प्रसारण आणि प्रायोजकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी अंदाजे 2500 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, या हंगामातील अर्धा हंगाम संपल्यानंतर स्पर्धा पुढे ढकलल्याने आम्हाला 2000 ते 2500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यंदाच्या हंगामात 52 दिवसांमध्ये 60 सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी 24 दिवसांत 30 सामने खेळणे शक्य झाले. या स्पर्धेच्या प्रसारण हक्कांसाठी स्टार स्पोर्टसकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून बीसीसीआयला सर्वाधिक तोटा सहन करावा लागणार आहे.
स्टार स्पोर्टससोबत पाच वर्षांसाठी 16 हजार 347 कोटींचा करार करण्यात आला आहे. याप्रमाणे दरवर्षी 3 हजार 269 कोटी रुपये होता. म्हणजे, एका हंगामातील प्रत्येक सामन्याचे मूल्यमापन अंदाजे 54.5 कोटी रुपये होते. यानुसार 29 सामन्यांचे 1 हजार 580 कोटींचे उत्पन्न मिळेल. परंतु अन्य सामन्यांसाठीच्या 1690 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच मोबाइल कंपनी व्हीओ, स्पर्धेचे विजेतेपद प्रायोजक यांच्याकडून प्रत्येक हंगामात 440 कोटी रुपये मिळतात. परंतु स्पर्धा पुढे ढकलल्याने हे उत्पन्नही बुडणार आहे. याशिवाय सहयोगी प्रायोजक कंपन्याकडून रक्कम मिळण्याची शक्यता कमी आहे.