नवी दिल्ली – रेमडेसिविरच्या आयातीवर आयात कर माफीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय खत आणि रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे या आयातीला प्रोत्साहन मिळेल आणि देशांतील वाढत्या मागणीची गरज भागेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. हे औषध अत्यवस्थ करोना रुग्णांना उपयोगी पडणार आहे, ते इंजेक्शनमधून दिले जाते. या औषधाच्या निर्यातीवर या आधीच बंदी घालण्यात आली आहे. या औषधाचा काळाबाजार करण्यावर कारवाई करण्याचे आदेश सदानंद गौडा यांनी या आधीच दिले आहेत.
सध्या संपूर्ण देशभर या औषधाची मोठी मागणी असली तरी त्या प्रमाणात पुरेसा पुरवठा नाही. त्यामुळे सामान्य रुग्ण अस्वस्थ झाले आहेत. या औषधांची उपलब्धता आणि पुरवठा यावर सरकारकडून लक्ष देण्यात येत असून, याच्या साठेबाजीला पूर्ण आळा घालण्याची सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. येत्या पंधरा दिवसांत या औषधांचे उत्पादन वाढवण्यात येणार असून, देशात त्यामुळे दर दिवशी रेमडेसिविरचे तीन लाख डोस उपलब्ध होतील, अशी माहिती खते आणि रसायने राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली.