बहुतेक लोकांच्या जीवनाचा मार्ग वळणा-वळणाचा असतो. क्वचितच एखाद्या नशीबवान माणसाचं जीवन अगदी सरळ-सोपं असतं. पण सामान्य माणसाचं आयुष्य हे चढ-उतार आणि वळणांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. काही वळणं सुखकारक असतात तर काही क्लेशदायक अनुभव देऊन जातात. काही वळणं नाईलाजानं घ्यावी लागतात. म्हणजे पाहा- नोकरीत कधीतरी एकदम बदलीची ऑर्डर येते आणि आपली त्रेधा तिरपीट होते. कधी खातं नवीन, तर कधी बॉस नवीन आणि काही वेळेला तर कुटुंबापासून दूरच्या गावी जावं लागतं. हे वळण नाईलाजानं घ्यावंच लागतं. पण या बदलीनंतर जर प्रमोशन मिळालं तर? मग ते सुखकारक पण होऊ शकतं. तरुणपणी एखाद्या आवडलेल्या व्यक्तीसाठी कुणी जीवनात एक क्रांतिकारी वळण घेतो. नशीब बलवत्तर असेल तर त्या व्यक्तीचा पाठलाग यशस्वी होऊन ती व्यक्ती जीवनसाथी बनते.
पण सर्वात अवघड प्रकार म्हणजे यू टर्न. व्यवस्थित मार्गक्रमण चाललेलं आहे असं वाटत असताना कुठंतरी लक्षात येतं की काहीतरी चुकतंय. मग मागे वळून म्हणजेच यू टर्न घेऊन ती चूक दुरुस्त करावी लागते. खूपसे विद्यार्थी कुणाच्या तरी सल्ल्यानुसार एखादा शिक्षणक्रम निवडतात. नंतर तो झेपत नाही असं वाटू लागतं किंवा हे आपल्या आवडीचं नाही असंही लक्षात येतं. पण तोवर काही वर्षे निघून गेलेली असतात. मग काय? यू टर्न घेऊन, ती वर्षे वाया घालवून अभ्यासक्रम बदलला जातो. काहींची तर सगळी वर्षे वाया जातात. घेतलेल्या क्वालिफिकेशनचा काहीही उपयोग न करता ती माणसं वेगळ्याच छंदाचा किंवा व्यवसायाचा मार्ग स्वीकारताना दिसतात. समाजात अनेक डॉक्टर किंवा इंजिनियर आपला व्यवसाय सोडून (किंवा क्वचित प्रसंगी सांभाळूनही) अभिनय, छायाचित्रण, संगीत असा वेगळाच मार्ग स्वीकारताना दिसतात. हाही यू टर्नचाच प्रकार आहे.
यू टर्न घेणारी व्यक्ती स्वत:ची समजूत घालत असते, वाटलंच होतं कुठंतरी चुकतंय! अथवा चुकीची माहिती मिळाल्यानं असं झालं. परंतु खरं तर यू टर्न म्हणजे चक्क पराभव किंवा सपशेल माघार हेच खरं. अर्थात हे यू टर्न घेणारी व्यक्ती मान्य करेलच असं सांगता येत नाही. याचं कारण म्हणजे असं करणं ही सामान्य जनांना शरमेची गोष्ट वाटत असावी.
याला अपवाद म्हणजे राजकीय व्यक्ती. राजकारणी लोक वारंवार यू-टर्न घेताना आढळतात. एवढंच नव्हे तर एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच ती अमान्य करण्याचं धाडसही नेते मंडळी दाखवीत असतात. बरं, असा यू टर्न पक्ष बदलल्यानं आणि परिणामी पॉलिसी बदलल्यानं घेतला जातो असंही नाही. आहे त्याच पक्षात राहून हा यू टर्नचा खेळ खेळता येतो. त्यांचं यू टर्न जास्तीत जास्त वेळा आढळतं ते निवडून आल्यावर-वचनपूर्तीची जेव्हा वेळ येते तेव्हा!
पूर्वी यू टर्न बेमालूमपणे घेता येत असे. कारण विधान केल्याचा किंवा वचन दिल्याचा पुरावा मिळणं अवघड होतं. पण आता माध्यमांची साधनं इतकी लीलया उपलब्ध झाली आहेत की वचन दिल्याची किंवा एखादं मत व्यक्त केल्याची चित्रफीत जेव्हा दाखवली जाते तेव्हा पंचाईत होते. मात्र कोडगे यू टर्नर यातूनही मार्ग काढतात. आय वॉज मिस्क्वोटेड किंवा माझ्या विधानाचा वेगळाच अर्थ काढला जातोय असं जाहीर करायला असे नेते मागेपुढे पाहत नाहीत.
अगदीच कोंडीत सापडल्यावरही त्यातून बाहेर पडायला मार्ग आहेच. ही चित्रफीत डॉक्टर्ड म्हणजे छेडछाड केलेली आहे आणि माझ्या तोंडी काही शब्द घुसडण्यात आले आहेत असं सांगता येतं. निर्ढावलेले राजकारणी तर त्यापुढेही जाऊन मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे असं म्हणायला कमी करीत नाहीत. याचं कारण म्हणजे “चौकशी’ला आपल्याकडे लागणारा विलंब. तसंच मधल्या काळात बरंच काही करता येऊ शकतं. शिवाय हुशार वकिलांची फौज दिमतीला असल्यावर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायला किती वेळ लागतो. पैशाची थैली मोकळी केली की झालं!
पापभीरू माणसाला मात्र यू टर्न घेतल्यावर जबाबदारी स्वीकारण्याखेरीज दुसरा मार्ग नसतो.
श्रीनिवास शारंगपाणी