मेलबर्न – अहमदाबादच्या खेळपट्टीवरून सुरू झालेले कवित्व अद्यापही संपलेले नाही. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी याबाबत टीकाटीपणी केली आहे. आता त्यात ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पीन गोलंदाज नाथन लॉयननेही आपले मत मांडले आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर होत असलेली टीका अनाकलनिय आहे. फिरकी गोलंदाजीचा यशस्वी सामना इंग्लंडच्या फलंदाजांना करता आला नाही व त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे मत लॉयनने मांडले आहे.
फिरकी गोलंदाजंचे चेंडू खेळणे त्यांच्यासाठी कठीण बनले होते. त्यामुळेच पराभवाला खेळपट्टी कारणीभूत असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, ज्या खेळपट्टीवर पहिल्या व दुसऱ्या डावात भारताच्या रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी जशी फलंदाजी केली ते पाहता खेळपट्टीत कोणताही दोष नव्हता. इंग्लंड संघ आपल्या सुमार कामगिरीचे खापर खेळपट्टीवर फोडत आहे. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळायला लागला म्हणून त्यांची अडचण झाली आहे. वेगवान खेळपट्टयांवर देखील अनेकदा बलाढ्य संघही नीचांकी धावसंख्येत बाद झाले आहेत. अहमदाबादची घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही, अशी टीकाही लॉयनने केली आहे.
भारताविरुद्धची तिसरी कसोटी इंग्लंडने 10 गडी राखून गमावली. या सामन्यात इंग्लंडचे दोन डाव अनुक्रमे 112 आणि 81 धावांत संपुष्टात आले. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन, ऍण्ड्रयू स्ट्रॉस, ऍलिस्टर कुक यांनी खेळपट्टीला जबाबदार धरले असले तरी लॉयनने मात्र, ही खेळपट्टी तयार करणार्या क्युरेटरचे लॉयनने कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघही वेगवान गोलंदाजांना मदत करत असलेल्या खेळपट्टीवर 47 व 60 धावांवर बाद झाला होता. त्यावेळी खेळपट्टीला नव्हे तर बेजबाबदार फलंदाजीला दोष दिला होता. इंग्लंडनेही आपल्या फलंदाजांच्या तंत्राचे आत्मपरिक्षण केले पाहिजे, असेही तो म्हणाला.