मुंबई – राज्यातील नोकरशाहीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सीताराम कुंटे यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवरून दिली. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी 1985च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांची नावे चर्चेत होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांच्या नावाला पसंती दिली.
सीताराम कुंटे येत्या 9 महिन्यांपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहू शकतील. कारण नोव्हेंबर 2021 मध्ये तेही सेवानिवृत्त होणार आहेत. सीताराम कुंटे सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत, तर प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. तर एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयातील नोकरशाही अजय मेहता यांच्या प्रभावातून मुक्त होणार असल्याचीही मंत्रालयात दबक्या आवाजात चर्चा आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर अजय मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून मंत्रालयात होते.
नुकताच अजय मेहता यांना महारेराला पाठविण्यात आले आहे. सीताराम कुंटे मुख्य सचिव झाल्याबरोबर मंत्रालयातील दुसरे सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव रिक्त होणार आहे.