मुंबई – राज्याच्या अनेक भागांत करोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबई आणि उपनगरांतही तीच स्थिती आहे. विदर्भातल्या काही अन्य जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात आला आहे. अमरावतीमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन अगोदरच जारी करण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मात्र धोक्याचा इशारा देत सूचक वक्तव्य केले आहे.
कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का नाही हे पुढच्या 10 दिवसांमध्ये स्पष्ट होईल असे त्यांनी म्हटले आहे. करोना रुग्णांची वाढ विदर्भामधून सुरु झाली आहे. मात्र आता राज्याच्या इतरही भागात त्याचा प्रकोप दिसून येतो आहे.
या रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असे म्हणता येणार नाही अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. दोन महिन्यानंतर रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.
अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 21 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाची रुग्णसंख्या आणि कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 6 टक्क्यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या असल्याचे काकाणींनी स्पष्ट केले आहे.