पुणे -सर्व सुरळीत सुरू असताना पुन्हा करोनाचे संकट उभे राहिले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि विदर्भ भागात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुण्यात जिल्हा प्रशासनाने रविवारी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, आता संसर्गासह विविध प्रश्न महाविद्यालये, पालक आणि विद्यार्थ्यांसमोर उभे आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार महाविद्यालये सुरू होत असताना, पुन्हा शिक्षणाची प्रक्रियेला एक प्रकारे स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व अभ्यासक्रम कसे पूर्ण होणार? विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकही वर्गात व्हावे लागते. ही प्रात्यक्षिक कशा पद्धतीने पूर्ण होतील, परीक्षा वेळेत होतील का? असा प्रश्न महाविद्यालयापुढे उभे राहिले आहेत.
महाविद्यालये सुरू होत असली, तरी काही पालकांची आजही मुलांना वर्गात पाठविण्याची मानसिकता नाही. ऑनलाइन वर्गास विद्यार्थीही कंटाळत आहेत. त्यातच आता आठवडाभर महाविद्यालये बंद आहेत. पण, आरोग्याला प्राधान्य देत पालकांचाही आता ऑनलाइन शिक्षणासाठी आग्रह होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षणसंस्थांनी ऑनलाइन शिक्षणच प्राधान्याने सुरू ठेवावीत, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.