मुंबई: दोन दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानातून खाली उतरवल्यानंतर राज्यात वेगळेच राजकारण निर्माण झाले आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचे राऊत म्हटले आहे.
राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही तर त्यांच्या आड भाजपकडून खेळण्यात येत आहे असे सांगत राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय हे राज्यपालामुळे रखडले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे असे राज्यघटना सांगते. असे असतानाही राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवला आहे. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही.”