मुंबई – करवाढ नसेल नसलेल्या अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी चालू ठेवली आहे. जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही भारतात मात्र जोरदार खरेदी होऊन निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर बंद झाले.
सोमवारी अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग चौथ्या दिवशी निर्देशांकात वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.71 टक्क्यांनी म्हणजे 358 अंकांनी वाढून 50,614 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी वाढून 14,895 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजार निर्देशांक वाढूनही शुक्रवारी एशियन पेंट्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधक विनोद मोदी यांनी सांगितले की, अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदार जास्तच आशावादी झाले आहेत.
आज झालेल्या खरेदीनंतर भारतीय शेअर बाजारात नोंदलेल्या कंपन्याचे एकत्रित बाजारमूल्य 200 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. आज सरकारी बॅंका आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात खरेदी झाली.