नवी दिल्ली – केंद्र सरकार शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत आणि संसदेबाहेरही चर्चा करण्यास तयार आहे, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. दरम्यान, विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे गदारोळ होऊन सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी काळे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. त्या गोंधळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सुमारे तासभरासाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी घोषणाबाजी कायम ठेवली.
तशात कॉंग्रेसचे सभागृहातील नेते अधिररंजन चौधरी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आंदोलनकाळात आतापर्यंत 170 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार सुरू आहेत. ती स्थिती ब्रिटीश राजवटीसारखीच आहे, असा आरोप त्यांनी केला.
त्यावर तोमर यांनी सरकारची चर्चेची तयारी असल्याची भूमिका मांडली. मात्र, सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत विरोधी पक्षांचे काही सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत दाखल झाले. गोंधळ थांबत नसल्याने सभापतींनी दुसऱ्यांदा दोन तासांसाठी कामकाज तहकूब केले.