भोपाळ – यापुढे सरकारी कार्यालये गोमूत्राद्वारे तयार करण्यात आलेल्या फिनाईलनेच स्वच्छ करण्यात यावीत असे आदेशच मध्य प्रदेश सरकारने काढले आहेत. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत एकच धांदल उडाली आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश काढले आहेत. केमिकल मिश्रित फिनाईलने कार्यालयाची स्वच्छता करण्यात येऊ नये, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची सोशल मीडियातून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी त्याला विरोध केला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मध्यप्रदेश सरकारला तर गोमूत्र सरकार म्हटलं आहे. तर, गोमूत्र फिनाईलपेक्षा काही वेगळी आयडिया तुमच्याकडे नव्हती का? असा सवाल काही यूजर्सनी केला आहे. काही यूजर्संनी तर या वादात बाबा रामदेव यांनाही घुसवले आहे. मध्यप्रदेश सरकारने गोमूत्र फिनाईलने कार्यालये स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे सर्वाधिक आनंद बाबा रामदेव यांनाच होईल, असा टोला काही यूजर्सनी लगावला आहे. गाईंची काळजी घ्या आणि गोमूत्र फिनाईलचा वापर करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लोकांनी गोमूत्र फिनाईलचे कारखाने सुरू करावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही उत्पादनापूर्वीच गोमूत्र फिनाईलची मागणी वाढवली आहे. त्यामुळे दूध दिल्यानंतरही लोक गाईंना रस्त्यावर मोकाट सोडणार नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातील गायींची देखभालही केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.