-ह.भ.प. गणेश म. भा. फड
जय जय वो शुद्धे। उदारे प्रसिद्धे। अनवरत आनंदे । वर्षतिये ।।
ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या ओवीत माऊली गुरूची पवित्रता सांगतात. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू आहेत.
माऊली म्हणतात, श्रीगुरू निवृत्तीनाथ हे आतून बाहेरून शुद्ध आहेत. पवित्र आहेत. उदारतेच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. आनंदाचा वर्षाव करणारे आहेत. म्हणून त्यांचा जयजयकार असो.
आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळू । आणि तत्वार्थींचा पायाळु । देखणा जो ।।
ज्याप्रमाणे सूर्य हा आतबाहेर शुद्ध आहे त्याप्रमाणे निवृत्तीनाथ शुद्ध आहेत. हिमालय, काशी आणि गंगा पवित्र मानले आहे. मात्र, त्याच्यापेक्षाही पवित्र श्रीगुरू आहेत.
हिमवंशु दोष खाये । परि जीविताची हानि होये । तैसे शुचित्व नोहे । सज्जनाचे ।। हिमालय पर्वतावर गेले असता पापाचा नाश होतो, मात्र तेथे मृत्यूची भीती आहे. मात्र श्रीगुरूचा पवित्रपणा धोक्याचा नाही असे माऊली सांगतात.