नवी दिल्ली – जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. निखिल दायमा असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून ते राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील सैदपूर गावचे रहिवासी होते.
निखिल दायमा हे भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटचे जवान होते. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यांना वीरमरण आलं. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीला सुट्टीवरून ते पुन्हा ड्युटीवर दाखल झाले होते.
२०१९ मध्ये सैन्यात भरती झालेल्या निखिल यांना उरीमध्ये पोस्टींग देण्यात आले होते. निखिल यांच्या हौतात्म्याची माहिती मिळताच त्यांच्या सैदपूर गावावर शोककळा पसरली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून निखिल यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Salute the martyrdom of Alwar, #Rajasthan’s braveheart Sh. Nikhil Dayma who made the supreme sacrifice in an encounter with terrorists in Jammu & Kashmir. My heartfelt condolences to his family members & prayers that they find strength. We stand with them in this difficult time.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 30, 2021
याआधी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी सैन्याच्या एका टीमवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले होते.