बीजिंग – सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर भारताच्या लस निर्मिती क्षमतेबद्दल चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
चीनमध्ये राहणारे भारतीय लोकही भारतीय लसीपेक्षा चिनी बनावटीच्या लसीला प्राधान्य देत आहेत असा दावा त्यांनी केला आहे. ग्लोबल टाइम्सने बीबीसीच्या वृत्ताच्या हवाल्याने पेशंट्स राइट्स ग्रुप ऑल इंडिया ड्रग्स ऍक्शन नेटवर्कने सीरमच्या लसीसंदर्भातील ब्रीजिंग स्टडी अपूर्ण असल्याचा दावा केला आहे.
करोना लसीचा पुरवठा करतानाही चीनने राजकारणाला प्राधान्य दिल्याचे पहायला मिळत आहे.
आपले राजकीय आणि आर्थिक हितसंबंध ज्या देशांमध्ये दृढ करण्याची चीनला गरज वाटत आहे, अशा देशांसाठी चीनने विशेष सवलतीच्या दरामध्ये लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ आणि मालदीवसारख्या भारताच्या शेजारी देशांचाही यामध्ये समावेश आहे.
नेपाळमधील औषध नियामक मंडळाने चिनी बनावटीच्या लसीला अद्याप परवानगी दिलेली नाही. तर मालदीव सरकारमधील सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार चिनी लसीसंदर्भात सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. तर भारताने आपल्या सर्व शेजारी देशांना अगोदरच भेट म्हणून लसींचे काही लाख डोस पाठवले आहेत व त्या देशांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याची तयारीही दर्शवली आहे.
शेजारी राष्ट्रांचे भारताच्या लसीलाच प्राधान्य असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे चीनचा जळफळाट सुरू झाला असून त्यातूनच तो देश भारतीय लसींना बदनाम करण्याचे कारस्थान रचण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.